सिंधुदुर्ग today
आंबेडकर चौकातील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अजय कांडर
प्रमुख पाहुणे म्हणून कवी वीरधवल परब निमंत्रित
नाटककार सिद्धार्थ तांबे यांच्या स्मरणार्थ १२ एप्रिल रोजी सावंतवाडीत संमेलन
संमेलन आयोजक विठ्ठल कदम, मधुकर मातोंडकर यांची माहिती
सावंतवाडी / प्रतिनिधी
'जाता नाही जात' या गाजलेल्या नाटकाचे लेखक - कवी सिंधुदुर्ग सुपूत्र प्रा. सिद्धार्थ विष्णू तांबे (शिरवल/कणकवली) यांच्या स्मृती जपण्यासाठी यावर्षीपासून त्यांच्या सिंधुदुर्गातील मित्रमंडळींतर्फे कवी तांबे यांच्या गाजलेल्या 'आंबेडकर चौक' या शीर्षकाने साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. यावर्षीच्या पहिल्या आंबेडकर चौक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी अजय कांडर यांची निवड करण्यात आली असून संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवी वीरधवल परब यांना निमंत्रित करण्यात आले आहे. रविवार 12 एप्रिल रोजी सायं.4.30 वा.सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे प्रमुख आयोजक साहित्य संस्कृती मंडळाचे विद्यमान सदस्य तथा कवी विठ्ठल कदम आणि कवी मधुकर मातोंडकर यांनी दिली.
सिद्धार्थ विष्णू तांबे यांनी कणकवली महाविद्यालय येथे शिक्षण घेतले. पुढील शिक्षण त्यांनी वेंगुर्ले आणि पुणे येथे घेतले. परिस्थितीशी संघर्ष करत मोठ्या जिद्दीने उच्च शिक्षण घेऊन वसई वर्तक महाविद्यालयात ते मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होते. एक नाटककार आणि कवी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. विख्यात नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या कार्यशाळेत तांबे यांचे जाता नाही जात हे नाटक वाचले गेले. त्यानंतर या नाटकाची संहिता आवडल्यामुळे अविष्कार या प्रतिष्ठित नाट्यसंस्थेने ते रंगभूमीवर आणले. मराठी नाट्यपरंपरेत जाता नाही जात हे वेगळे वैचारिक नाटक म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे हे नाटक शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशितही करण्यात आले. तांबे यांचा एक काव्यसंग्रहही प्रसिद्ध असून त्या संग्रहातील 'आंबेडकर चौक' ही त्यांची बहुचर्चित कविता. या एका कवितेने तांबे यांची कवी म्हणून स्वतंत्र ओळख मराठी साहित्यात निर्माण झाली. मात्र दुर्दैवाने तांबे यांचे अकाली निधन झाले. त्यामुळे सिंधुदुर्गातील त्यांचे साहित्यिक मित्र विठ्ठल कदम आणि मधुकर मातोंडकर यांच्या संकल्पनेतून या वर्षापासून आंबेडकर चौकातील साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे. सदर संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर यांची निवड करण्यात आली असून कवी कांडर यांनी बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे या आशयाची 'युगानुयुगे तूच ' ही लक्षवेधी दीर्घ कविता लिहिली.या कवितेवरचं नाटक सध्या बहुचर्चित झाले असून त्याचे प्रयोग सातत्याने आयोजित केले जात आहेत. त्याचबरोबर या दीर्घ कवीतासंग्रहाचा हिंदी अनुवाद दिल्ली वाणी प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला असून सुधाकर शेंडगे यांनी केलेला हा अनुवाद डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या हिंदी एम ए च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कांडर यांचा सिद्धार्थ विष्णू तांबे यांच्याशीही स्नेह होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर कांडर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर संमेलनाचे प्रमुख पाहुणे कवी वीरधवल परब हे आजच्या मराठी कवितेतील महत्त्वाचे कवी म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्र फाउंडेशन, राज्य शासन अशा अनेक नामवंत पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. त्याचबरोबर विद्रोही चळवळीशी स्नेह जोडून ते कार्यरत असतात. तसेच ते सिद्धार्थ विष्णू तांबे यांचे जवळचे मित्र होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर कवी परब यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती विठ्ठल कदम आणि मधुकर मातोंडकर यांनी दिली. संमेलना संदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क नंबर - 98230 48126

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा