सिंधुदुर्ग today



आकाशवाणीवरून उलगडत आहे ‘अज्ञात मुंबई’

सिंधुदुर्ग सुपुत्र लेखक नितीन साळुंखे यांच्या पुस्तकावर आधारित कार्यक्रम

मुंबई आकाशवाणी अस्मिता वाहिनी - एफ.एम.रेडिओवर प्रसारण

कणकवली / प्रतिनिधी

      सात बेटांपासून सुरू झालेल्या मुंबई नगरीचा इतिहास, तिच्या गल्ल्याबोळांतील न ऐकलेल्या कथा आणि ऐतिहासिक पाऊलखुणा आता रेडिओच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचणार आहेत. आकाशवाणी मुंबईने सिंधुदुर्ग सुपुत्र लेखक नितीन साळुंखे लिखित 'अज्ञात मुंबई’  या ग्रंथाची विशेष श्रुतिका कार्यक्रम 10 मे 2026 पासून सुरू केला आहे. सकाळ प्रसन्न करणारा हा कार्यक्रम स.7:45 वाजता मुंबई आकाशवाणी एफएम रेडिओवर आणि  स. 9 वा. मुंबई आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर प्रसारित होत आहे.

    या कार्यक्रमाची संकल्पना शैलेश माळोदे यांची असून वाचन अभिनेत्री नेहा कुलकर्णी आणि अभिनेता अक्षय शिंपी करत आहेत. निवेदनाची धुरा ज्योत्स्ना केतकर सांभाळत आहेत. मुंबईच्या ‘ज्ञात’ गर्दीत दडलेले ‘अज्ञात’ किस्से, वास्तूंच्या मागच्या कहाण्या आणि शहराच्या घडणीचे अनोखे टप्पे या कार्यक्रमातून उलगडत आहेत.

       हा कार्यक्रम लेखक नितीन साळुंखे यांच्या गाजलेल्या 'अज्ञात मुंबई : कहाणी मुंबईच्या ऐतिहासिक पाऊलखुणांची’ या पुस्तकावर आधारित आहे. मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे 296 पानी पुस्तक मुंबईच्या इतिहासाचा अनोखा दस्तऐवज मानले जाते. सात बेटं असल्यापासून किंबहुना त्याही आधीपासून अस्तित्वात असलेल्या मुंबईचा आजवरचा सारा प्रवास जाणून घेण्याचे वेड साळुंखे यांना आहे. त्यासाठी त्यांनी अख्खी मुंबई पालथी घातली, जुनी दफ्तरे शोधली आणि मुंबईविषयी कळलेला लहानमोठा तपशील बारकाईने तपासून घेतला आणि त्याचे ग्रंथ लेखन केले.पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, “ही अशी शोध मोहीम चालू असतानाच ज्यांना कुतूहल आहे, त्यांना मुंबईची कहाणी सांगत सुटलो. सोशल मीडियावर भरभरून लिहीत सुटलो. इथे रोजीरोटीचा विचार दुय्यम ठरत यातून हाती काय लागतं तर अज्ञात मुंबई! तीच सारी धावपळ म्हणजे हे पुस्तक – ‘अज्ञात मुंबई’!” हे पुस्तक वाचल्यानंतर वाचक मुंबईभर फिरताना आजवर जसे फिरत होते तसे न फिरता, लेखकाने परिचय करून दिलेली ‘मुंबई’ नीट पाहत जातील. “रोजचंच हे सभोवताल पाहणार आणि अचंबितही होणार… अशी होती मुंबई… असा अनुभव हे पुस्तक देते.

    आकाशवाणीने या पुस्तकातील निवडक प्रकरणे, किस्से आणि संदर्भ घेऊन श्राव्य माध्यमासाठी ‘अज्ञात मुंबई’ कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. नेहा कुलकर्णी आणि अक्षय शिंपी यांच्या आवाजातील वाचन आणि ज्योत्स्ना केतकर यांचे निवेदन यामुळे मुंबईचा इतिहास श्रोत्यांच्या काळजाला भिडत आहे. फोर्ट, भायखळा, परळ, गिरगाव येथील जुन्या वाड्या, विस्मृतीत गेलेली मंदिरे, पाण्याच्या टाक्या, बावड्या, पहिले कापड गिरणी कामगार, स्वातंत्र्यलढ्यातील गुप्त बैठका अशा अनेक ‘अज्ञात’ गोष्टींवर या कार्यक्रमात प्रकाश टाकला जात आहे.शैलेश माळोदे यांनी संकल्पना मांडताना सांगितले की, “मुंबईत प्रत्येक जण धावत असतो. थांबून आजूबाजूला पाहायला कुणाला वेळ नसतो. हा कार्यक्रम ऐकल्यानंतर श्रोता क्षणभर का होईना जागीच थांबेल आणि आपल्या शहराकडे नव्या नजरेने पाहील, हाच आमचा उद्देश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today