सिंधुदुर्ग today
अंजली ढमाळ लिखित 'निखळत्या चौकटीत’ कादंबरीवर 30 रोजी परिसंवाद.
समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे आयोजन.
कणकवली/प्रतिनिधी
स्त्री-जीवनातील चौकटी, त्यांची घुसमट आणि त्या मोडून बाहेर पडण्याची धडपड मांडणाऱ्या ‘निखळत्या चौकटीत’ या अंजली ढमाळ लिखित,रोहन प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या कादंबरीवर समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे शनिवार, 30 मे 2026 रोजी स.10.30 वा. पुणे. एस. एम. जोशी सोशॅलिस्ट फाऊंडेशन, नवी पेठ येथे विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. समीक्षक रेखा इनामदार साने यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात वक्ते म्हणून समीक्षक रणधीर शिंदे,स्त्री साहित्याच्या अभ्यासक गीताली वि.म. आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कादंबरीकार कृष्णात खोत सहभागी होणार असल्याची माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अजय कांडर आणि मधुकर मातोंडकर यांनी दिली.
लेखिका अंजली ढमाळ लिखित आणि रोहन प्रकाशनने प्रकाशित केलेली ‘निखळत्या चौकटीत’ ही कादंबरी अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरली आहे. परंपरेच्या, नात्यांच्या आणि सामाजिक बंधनांच्या चौकटीत अडकलेल्या स्त्री-मनाचा वेध घेणारी ही कादंबरी असून कादंबरीतील आशय, भाषा, निवेदनशैली आणि स्त्री-प्रश्नांची मांडणी या सर्व अंगांवर परिसंवादात चर्चा करताना तसेच कादंबरीचे विविध पैलू उलगडताना वक्ते सामाजिक संदर्भ, स्त्रीवादी दृष्टिकोन आणि साहित्यिक मूल्यमापन यावर प्रकाश टाकणार आहेत.कोकणातील कवी-लेखकांबरोबर महाराष्ट्रातील इतर भागातील साहित्यिकांनाही मंच उपलब्ध व्हावा, उत्तम गुणवत्ता असणाऱ्या लेखक कवींना प्रोत्साहन मिळावे आणि समाज वास्तव मांडणाऱ्या साहित्याला बळ मिळावे, या हेतूने समाज साहित्य प्रतिष्ठान कार्यरत आहे. ‘निखळत्या चौकटीत’वरील हा परिसंवाद केवळ एका कादंबरीची चर्चा नसून वाचन संस्कृती वाढावी, साहित्यावर संवाद घडावा आणि लेखक-वाचक यांच्यातील दुवा घट्ट व्हावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे समाज साहित्य प्रतिष्ठानचे अजय कांडर,मधुकर मातोंडकर यांनी स्पष्ट केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा